Saturday, January 3, 2015

माझे हिंदुत्व

मी जन्माने हिंदू आहे. सर्वधर्म समभाव हे मी शाळेत शिकलो. दुसऱ्यांचा द्वेष करू नये ही माझ्या आई-वडिलांची शिकवण. आमच्या घरी पूजा होतात , देवदर्शनालाही जातात. कधीमधी दानधर्मही असतो. देव दगडात नाही माणसात पहा असे गाडगेबाबा सांगतात. माझ्या धर्मात जेवढेही संत महात्मे होऊन गेले त्यात प्रत्येकाने थोतांडाला विरोधच केला. प्रत्येक वेळी कट्टरतेला विरोध केला आणि प्रेमाचाच संदेश दिला.  मी जसा मोठा झालो तश्या मला माझ्या धर्मातल्या गोष्टी खटकू लागल्या. धर्माचा आणि लोकांच्या आस्थेचा फायदा घेऊन माझ्या धर्माची/राजकारणाची दुकान मांडलेली मला सर्वाधिक खटकते. जेजुरीला गेलो तेंव्हा ६ तास रांगेत उभे राहून मला ६ सेकंदही दर्शन घेता आले नाही. समोर कमीत कमी १०० रुपये दान करायची जबरदस्ती करणारा भटजी होता. मी १० रुपये टाकल्यावर तो जवळपास माझ्यावर उखडलाच. आणि त्याने मला अक्षरश: हुसकून लावले. बाहेर शॉर्टकट मधे 'दिवसा' जागरण गोंधळ घालण्याचे ५०० रुपये होते. आईच्या आग्रहाखातर मी तेही केले. नंतर तुळजापूरला गेलो. माझा होणारा त्रागा पाहून आईने ब्राम्हण फिक्स केला , त्याला ५०० रुपये दिल्यावर त्याने आम्हाला VIP रांगेतून दर्शन दिले. तिथेही देवीचे दर्शन फक्त ४-५ सेकंद. तिथला भटजी पुन्हा माझ्यावर खेकसला होता. सामान्य लोकांचा वेटिंग टाईम सुमारे ६ तास होता. त्यात पुन्हा देवीला खण आणि नारळ , रुपये फक्त २०० ते ५००. ते घ्यायचं, गाभाऱ्यात द्यायचं आणि बाहेर पाहिलं की तीच गोष्ट परत "देवीला वाहिलेले खण रुपये ५००" विकायला हजर. ही २-३ उदाहरणं. अशी भरपूर उदाहरणं आणि अनुभव माझ्या वाट्याला आले. पुण्या-मुंबईत असाल तर गणपतीच्या दिवसांत दगडूशेठ किंवा लालबागला हा अनुभव घेऊन पाहू शकता. (किंवा घेतलाही असेल) तुम्ही कुठल्याही मंदिरात जा , बाजार मांडला आहे. आपण लकी आहोत आता सती जाण्याची हिंदू प्रथा बंद केली आहे. निर्मल बाबा, रामपाल, आसाराम , अनिरुद्ध बापू किंवा आलाने फलाणे बाबांचे भरघोस पिक आपल्या देशात आहे. त्यांची दिन दोगुनी रात चौगुनी प्रगती होत असते. हा पाखंड धर्मपंडित राजरोसपणे "हिंदू धर्माचे" नाव देऊन करत असतात. चारेक दिवसांपूर्वीच "किसिंग बाबा" ला हैदराबादमध्ये अटक झाली आहे. एकदा का धर्माला ढाल बनवली की त्यावर प्रश्न विचारणे साहजिकच पाप होते. जे मला बिलकुल अमान्य आहे. आणि धर्माच्या नावावर काहीही चुत्स्पा करणार आणि तो मानला तरच तुम्ही कट्टर हिंदू आहात अन्यथा तुम्ही हरामखोर आहात , तुम्ही दुसऱ्या धर्मावर टीका करून दाखवा , सारखी येडछाप आर्ग्यूमेंट मी फाट्यावर मारतो. दुसरे भंगार आहेत म्हणून तुमचे चांगले ठरत नाही. दुसऱ्याच्या नाकाला शेंबूड आहे म्हणून मीही शेंबड्यासरखाच राहणार, जोवर त्याचाशेंबूड साफ होत नाही तोवर मी माझा लटकत ठेवणार , हा शुद्ध मूर्खपणा आहे.
मी हिंदू आहे त्यामुळे मी हिंदू धर्मावरच टीका करणे स्वाभाविक आहे. आणि तशीही ती धर्मावर टीका नसतेच. टीका असते धर्माचा आधार घेऊन सुरु असलेल्या फालतूगिरीवर. मी मुस्लीम/ख्रिश्चन/बौद्ध /इतर असतो तर मुस्लीम/ख्रिश्चन/बौद्ध/इतर धर्मातल्या फालुतगिरीवर टीका केली असती. थोडक्यात, 'हा धर्म' ही अत्यंत फालतू आणि बिनकामाची गोष्ट आहे. धर्मातून ज्या ज्या चांगल्या गोष्टी, आहेत, ज्या माझ्या विवेकबुद्धीला पटतात तेवढ्या मात्र मी घेतो. धर्म हा चार भिंतीत राहिला पाहिजे, व्यक्तिगत राहिला पाहिजे आणि त्याचा वापर दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी होऊ नये. तेंव्हा धर्माला किती किंमत द्यावी हे ज्याचे त्याने ठरवावे.
तुम्ही जर शिवाजी महाराजांचे भक्त असाल तर फोटो शेयर करा - समजा नाही केला तर माझी श्रद्धा कमी ?
तुमच्या आईवर तुमचे प्रेम असेल तर फोटो लाईक करा - समजा नाही केला तर माझ्या आईवरचे माझे प्रेम शून्य ?
तुम्ही जर कट्टर हिंदू असाल तर अमुक तमुक करा - समजा नाही केलं तर मी हिंदू नाही ?
हिंदु धर्म बचाना हो तो आमके तमके पार्टी को वोट दो - समजा मी नाही त्याला मत दिलं तर माझी सुन्ता होणार?
हे असले प्रकार स्वत:चा मेंदु गहाण ठेवल्याचे प्रतिक अाहेत.
जीवन समृद्ध आणि आनंदी करण्यासाठी कट्टरतेची नाही तर समजदारीची आणि निर्मळ मनाची आवश्यकता आहे. धर्माच्या नावावर इतरांची मुंडकी कापण्यात , बॉम्बस्फोट करण्यात किंवा फेसबुकवर इतर धर्मियांना शिव्या देणारांना कधीच मन:शांती लाभत नाही. ते कायम द्वेषाच्या आगीत जळत राहतात. मी लहानपणी आजोबांसोबत जेंव्हा मंदिरात जायचो तेंव्हा आजोबा मला ऐकू येईल अशा आवाजात देवाला म्हणत " देवा, सर्वांना सद्बुद्धी आणि शांती दे" ( "सर्वांना" , फक्त हिंदूंना नव्हे) तेंव्हा मी म्हणायचो , तुम्ही देवाकडे चॉकलेट किंवा आईसक्रीम का मागत नाहीत ? त्यावर ते म्हणत , "तू मोठा होशील तेंव्हा तुला समजेल". मला समजले. पण आजूबाजूला वयाने वाढलेले खूप दिसतात , पण त्यांना ही साधी गोष्ट समजलेली दिसत नाही .
असो, प्रवचन देण्याचा मानस नाही. आज असेच काहीबाही खरडले आहे. जो तो ज्याला हवे तसे आपापल्या संस्कृती आणि संस्काराप्रमाणे वागायला स्वतंत्र आहे. दिखावे पे मत जाव, अपनी अकल लगाव. प्रत्येक धर्मात धर्माच्या नावावर चाललेला फालतूपणा आहे, धर्मांधता आहे. तेंव्हा हिंदू नसणारांनीही आपल्या धर्माचे मंथन करणे तितकेच जरुरी आहे, पण हा माझा आग्रह नव्हे.
स्पेशल आठवण : मी लहान असताना माझ्या गावात आठवडाभर अखंड हरीनाम साप्ताह चालत असे. गावाचं मुख्य विठ्ठल मंदिर सजलेलं असे. रोज सकाळी काकड आरती असायची. ज्ञानेश्वरी पारायण असे. आणि रोज संध्याकाळी फुकट गावजेवण आणि कीर्तन- भारुड असे. गावातला प्रत्येक जन वर्गणी गोळा करून तो इव्हेंट करत असे. प्रचंड पॉझीटीव्ह एनर्जी असायची, आणि बरंच चांगलं ऐकायला मिळायचं. शाकभाजी पुऱ्या आणि बुंदीचं जेवण दाबून खायचो. टाळ आणि टीका लावून कीर्तनकाराच्या बाजूलाच उभा राहायचो. सगळ्या जाती-धर्माची लोकं त्यात सहभागी असत , तात्पर्य , तिथे जाती-धर्मावरून गटबाजी नसायची! शून्य द्वेष वातावरण. कधी कोणत्या कीर्तनकाराने लव्हजिहाद चा मुद्दा सांगितला नाही , कधी कोणी धर्मपरिवर्तनाबद्दल बोलला नाही. कधी कोणी द्वेष करा म्हणून शिकवले नाही. मला माझ्या धर्माचा राग नाही, मी हिंदू असल्याचा मला कसलाही न्युनगंड नाही. उद्या मी हिंदु राहील की नाही अशी भिती मला कधीच वाटली नाही. हिंदु धर्म खतरेमे है असेही मला कधी वाटले नाही. माझा धर्म आणि माझ्या आस्था या पुर्णपणे वैयक्तिक असुन त्याची परिमाणे मी स्वत: ठरवतो. कोणी मुर्ख नेता किंवा धर्मपंडीत किंवा स्वयंघोषित धर्मरक्षकांना मला माझा धर्म शिकवण्याची गरज नाही.
एका विशिष्ट धर्माच्या कट्टरपंथी धर्मांधांमुळे पुर्ण जगाचा त्या धर्माकडे आणि त्या धर्माच्या लोकांकडे पहाण्याचा एक जबरदस्त नकारात्मक दृष्टिकोण तयार झाला आहे. त्या वाटेने माझा धर्म जाऊ नये..
ता.क.: लेखाचा हेतू आणि हल्लीची राजकीय परिस्थिती यात काही साम्य आढळल्यास आपल्या विवेकबुद्धीस जबाबदार धरावे.

No comments: