Saturday, July 5, 2014

क्रिकेटचा ओवरडोस

हे MCC विरुद्ध ROW ची म्याच म्हणजे थोर क्रिकेटर्सची मंगळागौर वगैरे वाटू लागले आहे. गेला बाजार सगळे राजकारणी एखाद्या गैरराजकीय कार्यक्रमासाठी एकच मंचावर जमले आहेत , आणि ते एकमेकांची अत्यंत मुक्तकंठाने स्तुती करत आहेत , हे जेवढं गुळचट वाटतं तेवढी गुळचट मला ही म्याच वाटते. फक्त आपल्या आवडत्या खेळाडूचा खेळ बघावा इतकंच सार काय ते यात. पण ते म्याच स्पिरीट , ते टशन आणायचं कुठून ?
मला लेट ९०ज किंवा २००५-६ च्या आधीचं क्रिकेट आठवतं. भारंभार सेरीज नसायच्या. श्रीखंडपूरी रोज खायला दिली तर त्यातला आनंद निघून जातो. त्यावेळीची श्रीखंड पुरी म्हणजे भारत पाकिस्तान म्याच. दौरा फिक्स झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून मी ग्रामपंचायतीत जाऊन एकूण एक पेपरचं शेवटचं पान वाचायचो. त्यावेळी २४x७ न्युज च्यानेल्स नसत. पेपरात कॉलम्स वाचायची ओढ असायची. म्याच पाहिलेली असली तरी दुसऱ्या दिवशी पेपरात बातमी वाचायला मजाच यायची.
सईद अन्वर , अमीर सोहेल , वकार , सक्लेन , इंझमाम , सलीम मलिक, वसीम चा भरणा असलेली टीम गांगुली , तेंडूलकर, द्रविड,कुंबळे , अझुरुद्दिन , प्रसाद श्रीनाथ, नयन मोंगिया , मांजरेकर वगैरे लोकं असलेल्या टीम बरोबर खेळायची . त्यावेळी बहुतेकदा भारत हरायचा. म्याचेस शारजा मध्ये व्हायच्या. त्यावेळी पहिल्या बॉलपासून जो थ्रील असायचा तो थ्रील किमान मला शेवटचा कधी मिळाला ते आठवत नाही. न्यूझीलंड-ऑस्ट्रेलियातल्या म्याचेस मी रात्री २-३ वाजता उठून पाहायचो. तेंडूलकर ओपनिंग करायचा आणि चामिंडा वास किंवा एलन डोनाल्ड किंवा मेग्रा जेंव्हा रन अप घ्यायचे तेंव्हा काळजाचे ठोके ऐकू येत. वर्ल्ड कप मधल्या पाकिस्तान विरुद्धच्या म्याच मध्ये सचिन ने टोलावलेला थर्ड म्यान वरचा सिक्सर किंवा कॅडीकच्या त्या शोर्ट बॉलवर एक पाय पुढे घेऊन मिड विकेट वर खेचलेला षटकार , कधी हेन्री ओलोंगाची काढलेली लक्तरं तो सचिन पुन्हा अनुभवावासा वाटतो. सौरव गांगुलीचा ऑफ ड्राईव ऑफकट किंवा डाऊन द विकेट येऊन मिड ऑन ला ग्राउंड बाहेर टोलवलेला षटकार , किंवा सेहवागने एकाच ओवर मध्ये ५ चौकार मारणे , किंवा कुंबळेने दिवसभर रडकुंडी आणलेल्या स्टीव वॉ ची विकेट घेणे , हरभजनची कोलकात्यातली हेट्रिक किंवा सेहवागची मुलतानी ट्रिपल सेंच्युरी .... यात जे थ्रील होतं ते गवसत नाही. भारत हरणे किंवा जिंकणे मोठी गोष्ट असायची.
आता त्या निघून गेलेल्या मेमरीज या पद्धतीने खेळवल्या गेलेल्या गुळचट म्याचेसमुळे परत येणे नाही. लय क्रिकेट झालं चांगलं झालं का वाईट झालं ?

No comments: